हिमायतनगर(प्रतिनिधी)सध्या secc - 2011 च्या यादीनुसार प्रधानमंत्री आवास योजनासाठी ग्रामीण भागातील प्राधान्यक्रम यादी करण्याचे काम सुरु आहे. आगामी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत यादीचे वाचन करून गरजूना लाभ दिला जाणार आहे. परंतु यादीत आलेल्या नावामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत असून, यात धनदांडगे व एकाच घरातील अनेकांची नावे समाविष्ठ करण्यात आल्याने खऱ्या गरजूना शासनाच्या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. हा प्रकार होऊ नये म्हणून शासनाने तत्कालीन यादीला बाजूला ठेवून नव्याने पूणरसर्वेक्षण करावे अशी मागणी तालुक्यातील मौजे डोल्हारी येथील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
नुकतेच विद्यमान शासनाने इंदिरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजनेत केले असून, ग्रामविकास विभागाचे सचिव आणि राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक यांच्या पत्रान्वये ग्रामीणच्या प्राधान्यक्रम याद्या तयार करण्याचे काम संबंधित गावाच्या विस्तार अधिकारी, मिनी बीडीओ, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून सुरु आहे. सदर याद्या ह्या कुटुंबाच्या घर निकषाबाबतची तालुकास्तरीय समितीने तपासणी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल 15 ऑगस्ट पूर्वी सादर करावयाच्या आहेत. परंतु योजनेच्या संदर्भाने त्या त्या ग्रामपंचायतील देण्यात आलेल्या याद्या ह्या mis -Awassoft वर उपलब्ध असलेल्या सन 2011 च्या संवर्गनिहाय आहेत. सदर याद्यात मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत असून, याद्यांमध्ये धनदांडगे, जमीन जायजाद व एकाच कुटुंबातील तीन ते पाच व्यक्तिनीची नावे छापण्यात आली आहेत. खरे पाहता शासनाच्या निकषानुसार नौकरदार, धनदांडगे, प्रतिष्ठित अश्यांचा समावेश करू नये असे निकष आहेत. परंतु त्यावेळी याद्या करणार्यांनी आपला स्वार्थ साधत रक्कम देणाऱ्यांची नावे यादीत समाविष्ठ केली तर अनेक खऱ्या गरजूना यातून डावलण्यात आले. त्यामुळे सदरच्या याद्यात मोठ्या प्रमाणात घोळ दिसून येत आहे. त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असून, पूर्वीच्या याद्या रद्द करून नव्याने फेरसर्वेक्षण करण्यात यावे. अशी मागणी डोल्हारी येथील नागरिकांनी नायब तहसीलदार गायकवाड याना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावर साहेबराव कदम, आनंदराव माने, सुदर्शन कदम, गजानन कदम, श्रीरंग कदम, रमेश कदम, बाबुराव कदम, सुभाष माने, शिवाजी हुंबे, राहुल राऊत, विजय सूर्यवंशी, दिगंबर डांगे, सुनीता माने, कांताबाई राऊत, पार्वतीबाई शिंदे, दत्ता नरवाडे, गोपीनाथ राऊत, रमेश कदम, गजानन कदम, बबन नरवाडे आदींसह शेकडोहून अधिक महिला - पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत.