दुष्काळग्रस्त जनतेच्या समस्यांचा पाठपुरावा करा! खा. अशोक चव्हाण
मुंबई(प्रतिनिधी)राज्यातील दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्याची गांभिर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. या परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक आज सकाळी मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक चव्हाण होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी राज्याच्या विविध जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थिती आणि विविध लोकसमस्यांवर चर्चा झाली. आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा झाली. प्रदेश कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक असल्याने प्रदेशाध्यक्षांनी जबाबदारी वाटपाच्या अनुषंगानेही पदाधिका-यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
राज्यातील दुष्काळ हाच या बैठकीतील चर्चेचा प्रमुख मुद्दा होता. दि. 5, 6 व 7 मे रोजी पक्षाचे प्रमुख नेते दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौ-याच्या अनुषंगानेही खा. अशोक चव्हाण यांनी पदाधिका-यांना सूचना केल्या. या भीषण दुष्काळाच्या काळात जनतेच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. त्यांच्या समस्यांची तीव्रता कमी करण्याची आवश्यकता आहे. दुष्काळी जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा, असे खा. अशोक चव्हाण याप्रसंगी म्हणाले. बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित होते.