नापिकी - कर्जबाजारीला कंटाळून हिमायतनगरात आणखी एका शेतकरयाची आत्महत्या
हिमायतनगर(अनिल मादसवार)सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून शहरातील एका ३५ वर्षीय युवा शेतकर्याने विषारी औषध प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना दि.२४ सोमवारी रात्री घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांवर डोंगर कोसळला असून, त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
शहरातील बजरंग चौक परिसरात राहणारा मयत शेतकरी गणेश शंकरराव कदम(कोरडे) वय वर्ष ३५ याने बैन्केचे कर्ज कडून खरीप हंगामात पेरणी केली होती. परंतु जुलै - ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वच पिके उध्वस्त झाली. परंतु शासनाची तुटपुंजी मदत शेतकर्याचे नुकसान भरून काढू शकली नाही. खरीपातील झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी सदर शेतकर्याने गहू, हरभऱ्याची पेरणी केली होती. परंतु काढणीला आलेली पिके हाती येण्यापुर्वीच वादळी वारे व गारपिटीने सर्व पिके आडवी झाली. पावसाने भिजलेली पिके पूर्णतः काळी पडून कोम्बे फुटल्याने पेरणीसाठी केलेला खर्च सुद्धा निघाला नाही. तेंव्हापासून तरुण शेतकरी आर्थिक विवंचनेत होता. आगमी काळातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च, गरजा कश्या भागवायच्या व खाजगी बैन्केचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत होता. अखेर सोमवारी संध्याकाळी बजरंग चौकातील राहत्या घरी कोणते तरी विषारी औषध प्राषण केले. हि बाब घरच्यांच्या लक्षात येताच तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु परिस्थिती गंभीर बनल्याने नांदेड येथील गुरु - गोविंदसिंग रुग्णालयात भरती करण्यात आले होते, येथे उपचार सुरु असताना सोमवारी रात्री तरुण शेतकर्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून, त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या पत्नीला मानसिक धक्का बसला असून, उपचारासाठी त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात भारती करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी १ वाजता शहरातील हिंदू स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी शहरासह तालुका परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. या घटनेतून सावरण्यासाठी शासनाने तातडीने शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक मदतीचा हाथभार लावावा अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.