जिल्हयातील 169 ग्राम पंचायतींच्या ग्रामसेवकांची आज नांदेडमध्ये आढावा बैठक
नांदेड (एनएनएल) शौचालय बांधकामाची गती वाढविण्यासाठी राज्यात स्वच्छता ही सेवा हे अभियान मोठया प्रमाणात सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हयातील ग्राम पंचायतींचे 50 पेक्षा कमी उद्दिष्ट शिल्लक असलेल्या 169 ग्राम पंचायतींच्या ग्रामसेवकांची आज गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी आकरा वाजता जिल्हा
परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार असून, यात शौचालय बांधकामाचा आढावा घेतला जाणार आहे. तरी संबंधित गावातील ग्रामसेवकांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बांधण्यात आलेली शौचालये, शिल्लक उद्दिष्ट व बांधकामाचे नियोजन आदी अद्यावत बाबींच्या माहितीसह कार्यशाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
शौचालय बांधकामाचे 1 ते 50 पर्यंतचे उद्दिष्ट शिल्लक असलेल्या ग्राम पंचायती स्वच्छता ही सेवा या अभियान कालावधीमध्ये शंभर टक्के हागणदारीमुक्त केल्या जाणार आहेत. यात भोकर तालुक्यातील 17 ग्राम पंचायती, बिलोली 9, देगलूर 7, धर्माबाद 11, हदगाव 26, हिमायतनगर 5, कंधार 9, किनवट 22, लोहा 8, माहूर 16, मुखेड 13, नायगाव 6, नांदेड 8 व उमरी तालुक्यातील 12 ग्राम पंचायतींचा यात समावेश आहे. यापूर्वी नांदेड जिल्हयातील मुदखेड व अर्धापूर तालुका हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. इतर 14 तालुक्यातील 169 ग्राम पंचायतीमधून ग्रामसेवकांनी शोचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही विशेष बैठक आयोजित करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.