कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड (अनिल मादसवार) गावस्तरावरील घाणीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी आता सर्वांनी पेटून उठले पाहिजे. तसेच ही लढाई जिंकून आपणां सर्वांना स्वच्छतेचे राज्य निर्माण करावयाचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र जिवनोन्नती अभियान व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बुधवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी खुले में शौच से आझादी व संकल्प स्वच्छतेचा स्वच्छ महाराष्ट्राचा या विशेष अभियानासाठी जिल्हयातील सर्व स्वंयसहाय्यता महिलांची जिल्हास्तरीय एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी, युनिसेफचे राज्य समन्वयक जयंत देशपांडे, आदर्श ग्राम पाटोदाचे भास्कर पेरे पाटील, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीचे माजी राज्य अध्यक्ष माधवराव पाटील शेळगावकर, स्वच्छतादूत माधवराव पाटील झरीकर, एम.एस.आर.एल.एम. चे वित्तीय समावेशन अधिकारी के.बी. दिक्षीत, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी चंदसिंग राठोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.आर. मेकाने, जिल्हा कृषि अधिकारी पंडीत मोरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले, मानव विकास मिशनचे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, डॉ. कैलास शेळके आदींची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, उघडया हागणदारीमुळे मोठया प्रमाणात रोगराई पसरते. ही रोगराई दूर करण्यासाठी घर तेथे शोचालय असणे आवश्यक आहे. यासाठी महिला बचतगटांनी पुढाकार घ्यावा. गावस्तरावर स्वंयसहाय्यता महिला बचतगटांना शौचालयाचे बांधण्याचे काम देण्यात येणार आहे. स्वंयसहाय्यता गटांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यासाठी प्रत्येक गटांना निधी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. आज ऑगस्ट क्रांतीदिनी आपण शपथ घेऊन आपल्या गावासह जिल्हा हागणदारीमुक्त करण्याची लढाई जिंकून स्वछतेचे राज्य निर्माण करु. यासाठी प्रत्येकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
प्रांरभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी भास्कर पेरे पाटील यांचे मार्गदर्शन झाले. ते म्हणाले, गावाचा विकास हा महिलांच्या हाती आहे. आमचे गाव महिलांच्या पुढाकाराने आदर्श ठरले आहे. महिलांनी गुड मॉर्निंग पथकातून जागृती केल्यास मोठया प्रमाणात शौचालयाची निर्मीती होण्यास मदत होणार आहे. आपल्या मिश्कील भाषेत गावस्तरावरील स्वच्छतेचे वास्तव चित्रण त्यांनी मांडले. याप्रसंगी त्यांनी पाटोदा गावाची यशोगाथा सादर केली. युनिसेफचे जयंत देशपांडे म्हणाले आज काळ बदला आहे. काळाच्या ओघात आपणासही बदण्याची गरज आहे. आज प्रत्येकाच्या घरात टी.व्ही., मोबाईल आणि चैनीच्या वस्तू याला जीवनात महत्व दिले गेले परंतू स्वच्छतेला जीवनात खरे महत्व असल्याचे ते म्हणाले. माधवराव पाटील शेळगावकर बोलतांना म्हणाले की, देवालय, विद्यालय व शौचालय या तीन गोष्टीला महत्व असून शरिराच्या शुध्दीसाठी प्रत्येकांनी शौचालयाची निर्मीती करुन त्याचा वापर करावा असे ते म्हणाले. यावेळी माधवराव पाटील झरीकर, के.बी. दिक्षीत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बचतगटाच्या निर्मला तुकाराम खिल्लारे, सुनिता कारभारी यांच्यासह बचतगटाच्या अध्यक्ष व सचिवांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रामचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी केले तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्हयातील सुमारे दोन हजार स्वंयसहाय्यता गटाच्या महिला उपस्थित होत्या.
एका बचतगटाने आठवडयात दहा शौचालयाची जबाबदारी घ्यावी - शिनगारे
शौचालयाच्या बांधकामात जिल्हयातील स्वयंसहाय्यता महिला बचतगटांचा सहभाग घेण्यात येणार असून गावातील प्रत्येक एका बचतगटाने एका आठवडयात किमान दहा कुटुंबांना भेटी देऊन शौचालय बांधकाम करुन घेण्याची जबाबदारी स्विकारावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. महिलांच्या पुढाकारानेच अनेक गावे आदर्श झाली असून नांदेड जिल्हयातील गावे आदर्श करण्यासाठी स्वयंसहाय्यता महिलांनी हीरीरीने सहभाग घेऊन गावाचा लौकीक वाढविण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आज जिल्हयातील 140 गावात शौचालय बांधकामासाठी विशेष मोहिम
खुले में शौच से आझादी व संकल्प स्वच्छतेचा स्वच्छ महाराष्ट्राचा या उपक्रमांतून आज नांदेड जिल्हयातल्या अर्धापूर व मुदखेड तालुका वगळून उर्वरीत 14 तालुक्यातील मोठया 140 ग्राम पंचायतीमधून शौचालय बांधकामासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून सकाळी 6 ते रात्री दहा वाजेपर्यंत शौचालयाचे शोषखड्डे तयार करण्यात येणार आहेत. यात सुमारे 25 हजार शोषखड्डे होण्याची अपेक्षा असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले आहे.