नांदेड (एनएनएल) केंद्र शासनाच्या वतीने खुले मे शौच से आझादी व राज्य शासनाच्या वतीने संकल्प स्वच्छतेचा स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला आजपासून प्रारंभ होत आहे. या अभियानाची गावस्तरावर शौचालय बांधकाम, त्याचा वापर व परिसरातील स्वच्छता या विषयावर भर देण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.
दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2017 या कालावधीत खुले मे शौच से आझादी तर 9 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधी संकल्प स्वच्छतेचा स्वच्छ
महाराष्ट्र हे अभियान राज्यभर राबविले जाणार आहे. या दरम्यान गावस्तरावर गृहभेटी देऊन आंतरव्यक्ती संवाद आणि इतर माध्यमांचा उपयोग करुन व्यापक स्वरुपात स्वच्छतेविषयी मोठया प्रमाणात जनजागृती मोहिम हाती घेऊन शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना गट विकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात शौचालय नसणा-या सर्व कुटुंबांना भेटी देऊन शौचालय बांधकामासाठी मानसिकता तयार करणे. यासाठी प्रत्येक पाच कुटुंबामागे एका प्रेरकाची निवड केली जाणार आहे. शौचालय असून त्याचा वापर न करणा-या कुटुंबांना शौचालय वापरास प्रवृत्त करणे, शौचालय बांधकामासंबंधी नागरीकांना माहिती व संपर्काचा तपशिल उपलब्ध करुन देणे. शौचालय बांधकामासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान पोहोचविणे, नादुरुस्त शौचालय दुरुस्ती अभियान राबविणे, ग्राम पंचायत, शाळा, अंगणवाडी, गावस्तरावरील शासकीय निमशासकीय कार्यालये, वाचनालये आदींसाठी स्वच्छता सोई सुविधा व वापर पडताळणी तसेच पिण्याच्या पाण्याची साठवण, वापर व हाताळणी या शुध्दतेच्या बाबींविषयी जागृती करण्यात येणार आहे.
शौचालय बांधकाम करण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे फोटो अपलोडींगचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली जाणार आहे. या अभियानाची पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना माहिती होण्यासाठी तालुकास्तरावर सरपंच, ग्रामसेवक, गावस्तरीय संपर्क अधिकारी, साधन व्यक्ती यांच्या बैठका घेतल्या जातील. तसेच या अभियान कालावधीत येणारे दिनविशेषानिमित्त विविध उपक्रम गावस्तरावर राबविण्यात येतील. लढा स्वच्छतेचा जागर हागणदारीमुक्तीचा हे घोषवाक्य घेऊन जिल्हयात स्वच्छतेची जनजागृती करुन संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, महिला बचतगट, युवक मंडळ, स्वयंसेवी संस्था आदींनी सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषेदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती समाधान जाधव, समाजकल्याण सभापती शिलाताई दिनेश निखाते, शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे, कृषि व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी, महिला व बाल कल्याण सभापती मधुमती राजेश कुंटुरकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड यांनी केले आहे.