नांदेड (एनएनएल) येथील सुप्रसिध्द कवयित्री व साहित्यिक ज्योती कदम यांना पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्या वतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी नुकताच जाहीर झाला आहे. पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात 13 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कार कदम यांच्यासमवेत डॉ. नरेशचंद्र काठोळे, इशान संगमनेरकर आदि मान्यवरांनाही घोषित झाला आहे.
ज्योती कदम यांचे मोरपीस आणि गारगोट्या, चित्रकाव्य आदि चार पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील विविध आकाशवाणी केंद्रांवरून काव्यवाचन केले असून त्यांची व्याख्यानेही प्रसारीत झाली आहेत. नामवंत व नवोदित साहित्यिकांच्या पुस्तकांवरील त्यांचे समीक्षणही अनेक दैनिकांमधून प्रकाशीत आहे. त्यांच्या कवितेचा शालेय अभ्यासक्रमातही समावेश झाला असून विविध वृत्तपत्रातून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या दै. श्रमिक एकजूटमधील कवी आणि कविता या सदराचे त्या गेल्या दीड वर्षापासून संयोजन करीत आहेत. यापूर्वी त्यांना दै. लोकमत सखी सन्मान पुरस्कार, कुसुमताई चव्हाण महिला भूषण विशेष सन्मान पुरस्कार, पंढरी युवा गौरव साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार, शिवांजली युवा साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार, आम्ही जिजाऊंच्या वारसदार या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांना आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचे मान्यवर व हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.