नांदेड (प्रतिनिधी) सध्या देशात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छतेची चळवळ जोरात असून त्यात शासकीय, निमशासकीय संस्थांचा स्वयंस्फूर्त सहभाग वाढला आहे.
राष्ट्रीय छात्रसेना ही देशातील विद्यार्थ्यांची सर्वात मोठी संघटना असून सुमारे 13 लाख छात्रसैनिक एकता, अनुशासन, स्वच्छता आणि धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्यांची जोपासना करण्याचे व्रत
अंगिकारतात. 52 महाराष्ट्र बटालियन नांदेड अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या 348 छात्रसैनिकांनी गुरूवारी पीपल्स कॉलेजच्या मैदानावर स्वच्छेची शपथ घेऊन महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकार करण्याचा संकल्प सोडला आहे. या अभियानात परिसरातील कचरा उचलून स्वच्छतेची प्रतिज्ञा अमलात आणली. यावेळी मेजर डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी उपस्थित सर्व छात्रसैनिकांना व अधिकाऱ्यंाना शपथ दिली.
यावेळी डॉ. विठ्ठल परिहार, डॉ. राजू गावंडे, श्याम गोरे, सवडतकर, ढवळे, प्रताप केंद्रे, डॉ. माणिक गाडेकर, कदम उपस्थित होते. याप्रसंगी राजर्षी शाहू विद्यालय वसंतनगर, शारदा भवन हायस्कूल, महात्मा फुले हायस्कूल बाबानगर, प्रतिभा निकेतन हायस्कूल कैलासनगर, पीपल्स हायस्कूल तसेच सायन्स कॉलेज, पीपल्स कॉलेज, यशवंत कॉलेज, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड इ. शाळा-कॉलेजच्या छात्रसैनिकांनी सहभाग घेतला. शेवटी डॉ. माणिक गाडेकर यांनी छात्रसैनिकांनी स्वच्छतेसाठी 1 वर्षातील 100 तास स्वच्छ भारत मिशन अंतर्गत श्रमदान करावे, असे आवाहन केले.