महिलांनी पकडलेले दारूबाबत पोलिसांची
शुल्लक कार्यवाही...
सरसम (साईनाथ धोबे) सणासुदीच्या काळात दारूविक्रीस बंदी असताना सरसम बु.गावात दारूचा महापूर वाहत आहे. परिणामी रोज - मजुरी करणाऱ्या महिलांना दारुड्या पतिराजाचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे वैतागलेल्या रणरागिण्या महिलांनी दि.10 बुधवारी सकाळी गावातील विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वारांना पकडून चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु शुल्लक कार्यवाही करून आरोपीताना सोडून दिल्याने महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गावातील दारूविक्री कायमस्वरूपी बंद नाही झाल्यास दारूबंदीच्या विरोधात महिला एल्गार पुकारण्याचा तयारीत आहेत.
याबाबत सवीस्तर वृत्त असे कि, जिल्ह्यातील व शहरातील काही परवानाधारक विक्रेत्याकडून हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताशी धरून अवैद्य रित्या दारू विक्रीचा गोरखधंदा चालविला जात आहे. याकडे संबंधित बिट जामदारांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महिला वारंगटून केला जात आहे. असाच कांहींसा प्रकार सरसम बु. गावात करणाऱ्यां दुचाकीस्वार दारूचे बॉक्स घेऊन अतिवेगाने जात होते. दरम्यान बसवेश्वर गल्लीतील झाडझूड करणाऱ्या महिलेस कट मारल्याने सदर महिला खाली पडली. त्या महिलेने आवाज दिल्याने आजूबाजूच्या महिला धावून आला. जेथे अवैद्य रित्या दारूची विक्रीकेली जाते त्या ठिकाणी जाऊन महिलांनी दुचाकी स्वारांना घेराव घालून चोप दिला. महिलांचा आक्रमक पवित्र पाहून त्यापैकी एकाने तेथून धूम ठोकली. तर एकाला महिलांनी त्याबात घेऊन त्याच्या डोक्यावर दारूचा बॉक्स डोक्यावर गावातून धिंड काढली. आणि पोलिसांना बोलावून त्यांच्या हवाली केले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.गावात गेल्या अनेक वर्षांपासून इंदिरानगर येथे एक व सरसम बु.गावातील बसवेश्वर गल्लीत दोन असे विना परवाना दारू विक्री करणारे विक्रेते आहेत. याना गावात दारू विक्री करू नये अशी विनंती महिलांनी अनेकदा केली होती. तसेच पहिल्या तंटामुक्त समितीवर निवड झालेल्या महिला अध्यक्षाने दारू विक्रेत्यांना पकडून कार्यवाही केली होती. त्यानंतर हा धंदा काही दिवस बंद झाला, त्यानंतर पूर्ववत दारूचा व्यवसाय तेजीत सुरु झाल्याने गावात दारूचा महापूर वाहत आहे. याबाबत पोलिसांना सांगूनही काहीच फरक पडत नसल्याने स्थानिक पोलीस व राजकीय वरदहस्ताने खुलेआम दारू विक्रीचा धंदा तेजीत सुरूच आहे. गेल्या महिन्यात याबाबत पोलीस अधीक्षकांना सुद्धा निवेदनाद्वारे अवैद्य दारूविक्री बंद करण्याची मागणी केली होती. परंतु याचा कोणताही फरक पडला नाही तर दारू विक्रेते छातीठोकपणे आम्ही पोलिसांना हप्ता देऊन धंदा करतो असे सांगत आहेत. परिणामी दारुड्या नवर्याच्या त्रास महिलांना सहन करावा लागत असून, नुकत्याच संपन्न झालेल्या नागपंचमीच्या काळात महिलांच्या आनंदात विरजण पडले. अनेकदा सांगूनही दारुविक्रीचा धंदा बन्द होत नसल्याने बुधवारी सकाळी येथील अनुसयाबाई यदलवाड, धुरपतबाई आलकोंडेवाड, गोदावरीबाई मिराशे, लक्ष्मीबाई शिंदे, शोभाबाई चंदनगे, ताराबाई बोले, अनिताबाई वडनपवाड, संताबाई बोले, अनुसयाबाई मंडलवाड, पार्वतीबाई डाके, गयाबाई डाके, शांताबाई पुणेवाड, गिरिजाबाई परसेवाड, रेखा मंडलवाड, रेणुकाबाई पेंटवाड, जिजाबाई वडनपवाड यांच्यासह अनेक महिलांनी रुद्रावतार दाखवीत दारूचा साठा पुरवठा करण्यासाठी आलेल्या पकडून पोलिसांच्या हवाली केले तर दुसरा पळवून जाण्यात यशस्वी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शे.सलीम शे.बाबा, शे.कलीम शे.बाबा रा.खडकी बा. यांच्यावर कार्यवाही केली असून, दारू पुरवठ्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी क्रमांक एम.एच.26 एएक्स 9309 आणि 180 एम.एलच्या 88 बॉटल असा एकूण 64 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बालाजी लक्षटवार हे करीत आहेत. दरम्यान महिलांनी पकडलेल्या लोकांवर कार्यवाही करण्यात आली असली तरी गावात दारू विक्री करणार्यांवर मात्र राजकीय वरदहस्तामुळे कोणतीच कार्यवाही केली नसल्याने पोलिसांच्या शुल्लक कार्यवाहीबाबत सरसम बु. व तालुका परिसरात उलट - सुलट चर्चा सुरु आहे.
मागील दोन महिन्यापूवी महिलांनी नवनिर्वाचित तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एड.अतुल वानखेडे व संबंधितांकडे केली होती. यावेळी सरपंच सौ.सायाबाई कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष व समितीच्या सदस्यांनी गावातील दारू विक्रेत्याच्या घराची झाडाझडती घेऊन सापडलेल्या दारूसाठा जप्त करून नष्ट केला होता. तसेच पुढील काळात दारूविक्री करण्यास मनाई केली होती. त्यांनंतरही दारू विक्रेत्यांनी आपला गोराकधंदा चालूच ठेवल्याने गावातील गोर - गरिबांचे संसार देशोधडीला लागत आहेत.