विजांचा कडकडाट प्रचंड वादळी वार्यासह पावसाच्या सरीने हिमायतनगर झाले ओलेचिंब...
रेल्वे रुळावर लिंबाचे झाड कोसळल्याने प्रवाश्यांची गैरसोय
हिमायतनगर(अनिल मादसवार) शहरासह परिसरात शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट, प्रचंड वादळी वा-यासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडून गेली, तर रेल्वे रुळावर महाकाय लिंबाचे वृक्ष तुटून पडल्याने रेल्वेने आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तसेच १३२ केव्ही विद्दुत केंद्रातून ३३ के.व्ही विद्दुत केंद्रात पुरवठा करणारी मुख्य लाईन जमीनदोस्त होऊन महावितरणचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
आज दि.०४ शनिवारी सायंकाळी अचानक तुफान वादळी वारे व विजांचा कडकडाट सुरु होऊन दुवाधार पावसाचे आगमन झाले. यामुळे सर्वाना आनंद झाला परंतु केवळ १५ मिनिटात पाउस थांबल्याने गार झालेला परिसर जमिनीतून निघणार्या वाफेने पुन्हा गरम झाल्याचा अनुभव आला आहे. वादळी वार्याच्या उग्ररुपामुळे नांदेड -किनवट रस्त्यावरील एका बियरबार शोपिचे समोरील ग्लासचे सुरक्षा कवच तुटून पडले. सुदैवाने समोर कोणी नव्हते, परंतु येथे असलेल्या काही दुचाकी व बियर शोपचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच हिमायतनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील एका महाकाय लिंबाच्या वृक्षाची भली मोठी फांदी वादळी वार्याने तुटून ०१ नंबरच्या रेल्वे रुळावर पडली होती. काही वेळातच रेल्वे येणार असल्याने येथील कर्मचारी व जागरूक युवकांनी फांदी बाजूला करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु, झाडाची फांदी काढण्यास विलंब झाल्याने इंटरसिटी एक्स्प्रेस दुसर्या रुळावर वळविण्यात आली. त्यामुळे प्रवाश्यांची मोठी गैरसोय झाली असून, पहिल्या प्लैटफोर्मवरून दुसर्या प्लैटफोर्मवरून येण्या - जाण्यासाठी लोखंडी उड्डाण पूल नसल्याने वयोवृद्द, आजारी रुग्ण, अपंग, चिमुकल्या बालकांना, तसेच लगेज घेऊन येणाऱ्या प्रवाश्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे अनेकांनी रेल्वे प्रशासनाकडून होत असलेल्या उड्डाण पुलाच्या दिरंगाई बाबत लाखोली वाहत बोटे मोडली. अर्ध्या तासानंतर इंटरसिटी एक्स्प्रेस आदिलाबादकडे रवाना झाली.
रोहीण्याच्या पावसाने मातीचा सुगंद दरवळला
------------------------
गेल्या तीन दिवसापासून रोहीण्याचा पाउस येत असून, शनिवारी झालेल्या दमदार पावसाच्या सरीने हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतीतील मातीचा सुगंद दरवळत होता. या पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पाउस वेळेवर पडेल अशी अशा शेतकर्यांना लागली आहे. अनेक शेतकर्यांनी पेरणीची तयारी सुरु केली असून, बी - बियाणे खरेदी करून काहींनी तर धूळ पेरणीला सुरुवात केली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पहिल्याचा पावसात नगरपंचातीचे पितळे उघडे
---------------------
आजच्या वादळी पावसाने अनेकांच्या घरावरील टीन- पत्रे उडुन गेली असून, शहरातील नाल्या पाण्यानं भरून वाहू लागल्या होत्या. त्यामुळे नालीत साचून बसलेली घाण, प्लास्टिक, केरकचरा थेट रस्त्यावर आल्याने सराफा लाईन, बाजार चौक, चौपाटी व ग्रामीण रुग्णालय परिसरात दुर्गंधी पसरली होती. पावसाळ्यापूर्वी नगरपंचायतीने नालेसफाई बाबत केलेल्या दिरंगाईचे पितळे उघडे पाडले आहे.
मुख्य लाईन खांब - तारे जमीनदोस्त तालुका अंधारात
शहर व परिसरात अनेक ठीकाणी मोठ - मोठी झाडे व फांद्या कोसळल्या असून, यामुळे विजेचे तारा तुटल्याने विद्दुत पुरवठा गुल झाला आहे. तसेच हिमायतनगर, सरसम ३३ केवि. विद्दुत केंद्राला वीज पुरवठा करणारी मुख्य लाईन प्रचंड वादळी वार्याने अक्षरश्या नागमोडी झाली असून, विद्दुत तारा जमिनीवर पडल्या आहे. त्यामुळे अखां तालुका अंधारात राहण्याची शक्यता असून, उकाड्यात रात्र काढावी लागणार आहे. एकुनच प्रचंड वादळी पावसाने महावितरणसह अनेकांचे नुकसान केले असले तरी पावसाच्या आगमनाने वातावरण गार होऊन थोडफार का होईना उकाड्यापासून दिलासा मिळाला आले.
याबाबत उपकार्यकारी अभियंता पंडित राठोड यांच्याशी संपर्क केला असता महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीच्या कामाला लागले असून, रात्रीला विद्दुत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न चालू आहेत. शक्य झाल्यास शहराचा तरी पुरवठा सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.