नांदेड (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या मुसळधार व वरील पातळीवर झालेल्या दमदार पावसाने आसन नदीला पूर आला असून, या पुराच्या पाण्याने महानगर पालिकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या पंपहाऊसला वेढा घातल्याने पाच कर्मचारी अडकले होते. सायंकाळी आपत्कालीन पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
नांदेड, परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे असणं नदी दुथडी भरून वाहत असून, नांदेड जवळील बंधार्यावरचे गेट बंद असल्याने चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. या ठिकाणी कामावर आलेले पाणी पुरवठा विभागातील पाच कर्मचारी अडकून पडले. याबाबतची माहिती मनपाच्या वरिष्ठ अधिका-यांना भ्रमणध्वनीवरुन दिली. तातडीने मनपाच्या अधिका-यांनी मनपाच्या अग्नीशमन दलासह एअरपोर्टच्या पथकाला सकाळी 8 वाजता अलर्ट करण्यात आले. सकाळी 8.30 च्या सुमारास सर्व साहित्यासह पथक आसना नदीजवळ पोचले. यानंतर लाईफ जॅकेट आणि दोरीच्या सहाय्याने या संयुक्त पथकाच्या कर्मचा-यांनी पंपहाऊस गाठले. त्या ठिकाणाहून या कर्मचाऱ्यांना दोरीच्या सहाय्याने कसरतीनंतर दुपारी पुरातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. बाहेर आल्यानंतर सर्वानि सुटकेचा निश्वास घेतला. आजचा हा थरार पाहण्यासाठी नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
खरे पाहता पुरा स्थिती लक्षात घेऊन आसना नदीच्या पात्रात असलेल्या बंधा-याचे गेट उघडणे आवश्यक होते. परंतु याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे असणं नदी दुथड्या भरून वाहू लागली. तर बंधारा ओलांडून पाणी जात होते. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे बंधा-याच्या एका बाजूच्या भींतीचे मोठे नुकसान झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकात पाणी घुसल्याने शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पुरात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना परिस्थिती योग्य रित्या हाताळून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यु ऑपरेशनमध्ये अग्नीशमन अधिकारी रईस पाशा, विक्की ठाकूर, सूर्यवंशी, पारधी आदींसह कर्मचा-यांनी सहभाग घेतला.
शहर परिसरात आणि आसना नदीच्या वरच्या भागात दुपारपर्यंत संततधार पाऊस सुरुच असल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर उड्डाण पुलावरून ये - जा करताना वाहनांची मोठी रीघ लागल्याचे दिसून आले आहे.