क्रिकेट विश्वात अजित वाडेकर यांच्यामुळे भारताचा दबदबा निर्माण झाला - मुख्यमंत्री
मुंबई(प्रतिनिधी)परदेशात जाऊन भारतीय क्रिकेट संघ जिंकू शकतो, हे अजित वाडेकर यांनी जगाला दाखवून दिले. त्यांच्यामुळे क्रिकेट विश्वात भारताचा दबदबा निर्माण होण्यास सुरुवात झाली असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचा अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महापौर स्नेहल आंबेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर, अजित वाडेकर यांच्या पत्नी रेखा वाडेकर, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, जोपर्यंत भारतात क्रिकेट जिवंत आहे, तोपर्यंत अजित वाडेकर यांना कुणीही विसरू शकत नाही. त्यांच्यामुळे भारतीयांना क्रिकेटचा निखळ आनंद मिळाला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक खेळाडू मोठे झाले हेच अजितजींचे मोठेपण आहे. उत्तम फलंदाज, उत्तम कर्णधार, उत्तम व्यवस्थापक असलेले श्री. वाडेकर अष्टपैलू व्यक्ती आहेत.