धान्याच्या काळ्या बाजार

स्वस्त धान्याच्या काळ्या बाजार करणाऱ्या भ्रष्ट दुकानदारांना पुरवठा विभागाचे अभय

हिमायतनगर(प्रतिनिधी)गोर गरिबांसाठी मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा ऑनलाईन रेकोर्ड होत असले तरी तालुक्यात धान्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात चालूच आहे. तेलंगाना राज्याच्या सीमेवर असलेले हिमायतनगर शहरात परिसरातील अनेक तालुक्याचे धान्य एकत्र होऊन परप्रांतात पाठवून धान्याच्या काळ्या बाजार केला जात असल्याने एक प्रकारे केंद्रबिंदू बनले आहे. या भ्रष्ट रेशन दुकानदार व माफियांना तहसील पुरवठा विभागाचे अभय मिळत असल्यानेच लाभार्थ्यांना जादा दर आकारले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एवढेच नव्हे तर ऐन दिवाळीत बहुतांश लाभार्थ्यांना साखर मिळाली नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या गैर प्रकारची नूतन तहसीलदार श्री गजानन शिंदे साहेब दखल घेवून त्या दुकानदार व धान्य माफियावर कार्यवाही करतील काय..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हिमायतनगर तालुक्यात एकूण ५३ ग्रामपंचायती असून, त्या सर्व गावातील कुटुंबाना जवळपास ७३ परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदार आहेत. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्याना लाभ मिळत असला तरी अन्न सुरक्षा योजनेचे बहुतांशी लाभार्थी हे सधन कुटुंबातील घेण्याचा चमत्कार अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी केला आहे. राशन कार्डची फोड करून संख्या वाढविण्यात स्वस्त धान्य दुकानदार यशस्वी झाले आहेत. विभक्त राशन कार्ड करून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा मालीदाही अनेक दुकानदारांनी लाभार्थ्याकडून ५०० ते १००० प्रती कार्ड या प्रमाणात लाटल्याचे अनेक तक्रारी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी केल्या होत्या. परंतु भागीदारीत असलेल्या पुरवठा विभागाच्या संबंधिताने एकाही दुकानदाराची चौकशी करण्याचे वा कार्यवाही करण्याचे धारिष्ठ दाखविले नाही. परिणामी पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने नागरिकांचा संताप अनावर होत असून, अनेक स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना कमी धन्य देवून एक तर जादा दर आकारतात. आणि महिन्याला किमान आठ ते पाच कुंटल धान्य काळ्या बाजारात विक्री करून रजिस्टर मेंटन करत असल्याचे नागरिक सांगतात. 

हिमायतनगर शहर तेलंगाना सीमेवर असल्याने अनेक ठिकाणच्या स्वस्त धान्याचा माल हे येथूनच तेलंगाना मध्ये पाठविल्या जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यात हिमायतनगर येथील अनेक स्वस्त धान्य दुकानदारासह राजकीय वरदहस्त असलेले बडे दलाल सक्रिय असल्याचे दिसून येते. यात अनेक दुकानदार पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांना हाताशी धरून गोर - गरीबांचा घास काळ्या बाजारात विकून मालामाल होत आहेत. परिणामी हक्काच्या धान्यापासून वंचित राहून गरिबांवर उपाशी पोटी राहण्याची वेळ येत आहे. 

परवानाधारक बहुतांश स्वस्त धान्य दुकानदार शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार स्वस्त धान्याचे वितरण करीत नसून, महिन्यातून पाच - आठ दिवस दुकान उघडून उर्वरित माल परस्पर काळ्या बाजारात लांबवीत असल्याचे वंचित लाभार्थ्यामधून सांगितल्या जात आहे. वितरीत केलेल्या धान्याची लाभार्थ्यांना पावती दिली जात नसून, शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकच दर आकारून दिवसा - ढवळ्या लाभार्थ्यांची लुट करीत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आअहेत. अनेक दुकानदार उर्वरित स्वस्तधान्य प्रशासनाकडे परत देत असल्याचे सांगत असले तरी खरा प्रकार काही औरच असल्याचे आढळून येते आहे. 

केरोसीन वितरणमध्ये सुद्धा घोळ 
----------------------------- 
रेशन बरोबर यातील व अन्य मिळून ७८ दुकानदाराकडे केरोसीन वितरणाचा ठेका दिलेला असल्याने त्यातही मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार दिसून येते आहे. नियमानुसार कार्डधारकांना डावलून वाहनांना ३० ते ३५ रुपये जादा दराने रॉकेलची विक्री केली जात आहे. विजेच्या टंचाई मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना केरोसीन मिळत नसल्याने गोड्तेलाचे दिवे लावावे लागत आहेत. तर ऐपत नसलेल्या झोपडीतील कार्ड धारकांना रात्रीला अंधारात राहण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सुरेश काकांनी, नव्याने रुजू झालेले जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष देवून खर्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून भ्रष्ट दुकानदारावर व धन्य - केरोसिनचा काळ्या बाजाराला मूकसंमती देणाऱ्या पुरवठा विभागातील संबंधितांच्या मालमत्तेची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी धान्य व केरोसिनच्या लाभापासून वंचित लाभार्थी व नागरीकातून केली जात आहे. 

दिवाळीत अनेकांना साखर मिळालीच नाही 
----------------------------- 
यावर्षी महागाईने उच्चांक गाठल्याने शासनाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाना साखरेचे नियतन मंजूर केले होते. त्या प्रमाणे प्रती व्यक्ती लहान - मोठे असे ५५० ग्रेम साखर १३ रुपये ५० पैसे या दरानेच देणे अनिवार्य होते. त्याचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, अन्नपूर्णा, अंत्योदय व अन्नसुरक्षा यांना लाभ मिळणार होता. परंतु काही रेशन दुकानदारांनी दिवाळीपूर्वी वितरण तर केलेचे नाही. अनेकांनी तर साखर गायब केल्यामुळे बहुतांश कुटुंबियांची दिवाळी कडू झाली. याबाबत काहींनी तहसील कार्यालाकडे साखर मिळाली नसल्याच्या तक्रारी केल्या. परंतु लाल्चावलेल्या संबंधित अधिकार्यांनी त्या दुकानदारावर कार्यवाही करणे तर सोडाच आपल्या स्वार्थासाठी अभय दिल्याचा आरोप वंचित नागरिक करीत आहेत. 

याबाबत पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार शे.रफिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, मी बाहेरगावी लग्नात आहे. तुम्हाला काय माहिती पाहिजे ते सकाळी ऑफिसला या काढून देतो असे सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी