रामचंद्र देठेना शासनाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार
औरंगाबाद(प्रतिनिधी)येथील जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे यांना राज्य शासनाचा सन
2013 सालाचा राज्यस्तरावरील यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख 41
हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून येत्या 4
फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात त्यांना
हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
रामचंद्र
देठे हे मूळचे किनवट जि. नांदेड येथील असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठातून सन 1984 मध्ये पत्रकारितेची पदवी घेतली. 1985 मध्ये त्यांची माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयात माहिती सहाय्यक म्हणून निवड झाली. शासनाच्या
माहिती खात्यात काम करीत असतांना त्यांना नाशिक विभागातील शासनाचा 1986 सालाचा
उत्कृष्ट विकास वार्ता प्रथम पुरस्कार मिळाला होता. त्यांनी नाशिक येथे आदिवासी प्रकर्षित
प्रसिद्धी पथकात नंतर लातूर येथे जिल्हा माहिती कार्यालयात काम केले. लातूरच्या भूकंपात त्यांनी उत्कृष्ट काम केले
आहे. भूकंप पुनर्वसनावर त्यांनी
विकासात्मक लेख लिहिले. यवतमाळ (उमरखेड)
येथे त्यांनी आपल कार्याची चुणूक दाखवून उत्कृष्ट जनसंपर्क साधला. गडचिरोली जिल्ह्यातही त्यांनी जिल्हा माहिती
अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केल्याने त्यांना एक जादा वेतनवाढ मिळाली.
शासनाचे
लोकराज्य मासिक सुशिक्षित बेरोजगारांपर्यंत पोहचविण्याचा त्यांचा पॅटर्न
त्यावेळच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालिका व आताच्या सचिव श्रीमती मनिषा पाटणकर यांनी
संपूर्ण राज्यातील जिल्हा माहिती कार्यालयात राबविला व अद्यापही तो सुरू आहे. श्री.
देठे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल औरंगाबाद विभागाचे माहिती संचालक राधाकृष्ण
मुळी, सहाय्यक संचालक रविंद्र ठाकूर, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्र,
विभागीय माहिती कार्यालयातील तसेच मराठवाडा, विदर्भ व खान्देशातील पत्रकार,
अधिकारी, औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालय व माहिती केंद्रातील अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.