अन्न सुरक्षेच्या लाभापासून वंचित लाभार्थ्यांनी घेतली घाडगे यांची भेट...
हिमायतनगर(प्रतिनिधी)मौजे पारवा खु.येथील गोरगरीब व खर्या नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी वंचित ठेवल्याची तक्रार शेकडो महिला व पुरुषांनी खुद्द उपविभागीय अधिकारी श्री दीपक घाडगे यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे पारवा खु. येथील नागरिकांना स्वस्त धान्य रास्त भावात वितरण करणाऱ्या दुकानदाराने मनमानी कारभार सुरु केला आहे. गरिबांना (शिधा पत्रिका)राशनकार्ड मिळून देतो म्हणून हजारो रुपये घेऊन अजूनही त्यांना शिधा पत्रीकेपासून वंचित ठेवले आहे. एवढेच नव्हे तर खर्या गोर - गरीब व शेतमजुरांना अन्न सुरक्षा योजनेतून डावलले असून, ज्यांच्याकडे तीन चाकी, चार चाकी, १५ एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे, तसेच ओलिताखाली जमीन असलेल्या नजीकच्या धनदांडग्याना या योजनेत समाविष्ट करून लाभ मिळून दिला आहे. या प्रकारामुळे खरे गरजू लाभार्थी शासनाच्या या उद्दात योजनेपासून वंचित ठेऊन स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले उखळ पांढरे करीत शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे.
या बाबत विचारणा करण्यासाठी येथील वंचित लाभार्थी गेले असता, तुम्ही तहसीलदाराकडे जा तेथून नावे आल्यानंतरच तुम्हाला अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळून देतो अशी भाषा वापरून गरीब व मजूर दरांची थट्टा केली जात आहे. सदर पावनाधारक रास्त भाव दुकानदाराच्या कारभाराची चौकशी करून प्रत्येकी हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्याचा परवाना निलंबित करावा. तसेच पारदर्शक लाभ मिळून देण्यासाठी येथील दुकानाचा परवाना स्वयं सहायता बचत गाताना देण्यात यावा अशी मागणी वंचित महिलांनी केली आहे. यावेळी निर्मला खंडेराव पतंगे, विठाबाई देवराव जाधव, लक्ष्मीबाई युकाराम जाधव, लता रमेश पतंगे, पुण्यरथा ज्ञानेश्वर जाधव, वंदना बापूराव पतंगे, फातमाबी शे.सलीम, शायीन शे.कादर, मुक्ताबाई काशिनाथ फाळके, मंदाबाई सुनीलराव जाधव, जयादाबी स.नजीर, शबाना बी बशीर, सालीमाबी शे.खदिर, हसीना बी शे.इम्रान, सागरबाई शंकरराव जाधव, पुष्पा बालाजी जाधव, रुख्मिनाबाई विठ्ठलराव जाधव, पादिमानाबाई किशनराव जाधव, विमलबाई सीताराम पतंगे, नंदाबाई पंडितराव पतंगे, अबेदाबी फकीरखान यांच्यासह ६० ते ७० महिला उपस्थित होत्या.
यावेळी श्री घाडगे यानी महिलांना चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून, शुक्रवार दि.०५ रोजी येथील स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशीसाठी पथक पाठविले जाणार आहे. त्यावेळी वंचित नागरिकांनी उपस्थित राहावे असेही सुचित करण्यात आले आहे.