पावसासाठी महिलांचे देवांना साकडे
हिमायतनगर(वार्ताहर)वरून राजाने डोळे वटारल्याने अन्नदाता शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. महिना लोटला तरी पाऊस झाला नसल्याचे धरणी मातेचा कंप अजूनही कोरडाच आहे. आता तरी मान्सूनचा पाऊस व्हावा व वरुण राजाने सगळीकडे हजेरी लाऊन रान ओलेचिंब करावे यासाठी येथील बजरंग चौक परिसरातील महिलांनी देवांना साकडे घालून जलाभिषेक केला आहे.
शेतकर्यांना लाभदायक मानले जाणारे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. मृगात वरून राजा न बरसल्याने आर्द्रा नक्षत्राची आशा शेतकर्यांना होती. परंतु या नक्षत्रही जुलै महिना सुरु होऊन पाच दिवस लोटले तरी बरसला नासल्याने शेतकर्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आगामी काळात शेतकर्यांच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल एक महिना पेरण्या लांबल्या आहेत, आर्द्रा नक्षत्राच्या शेवटी तरी मान्सूनचा पाउस व्हावा आणि शेतकर्यांना नैसर्गिक संकटातुन वाचवावे अश्या पद्धतीचे साकडे घालत शहरातील बजरंग चौक परिसरातील महिलांनी तळपत्या उन्हात डोक्यावर कळशी घेऊन पैनगंगा नदीपर्यंत पदयात्रा काढली. तसेच शहरातील बालाजी, पवनसुत हनुमान, कालीन्का माता, दक्षिण मुखी हनुमान, महाकाली, पोचम्मा देवी, बारतोंडी, परमेश्वर, राम मंदिरातील देवी देवतांना जलाभिषेक करीत चांगला पाऊस पडून सुगीचे दिवस येऊ दे असे साकडे घातले आहे. यावेळी महिला, लहान बालकांनी सुद्धा यात सहभाग घेतला होता.