नदीकाठावरील शेतकरी अनुदानापासून वंचित... चौकशीचे आदेश देवूनही कार्यवाही गुलदस्त्यात
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर तालुक्यात गतवर्षी जुलै - ऑगस्ट महिन्यातील खरीप हंगामात मुसळधार पाउस झाल्याने पैनगंगा नदीला तीन वेळा पूर आला होता. या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये शिरल्याने शेतजमिनीसह पिके पूर्णतः खरडून गेलि होती. याबाबतचे वृत्त नांदेड न्युज लाइव्हने सातत्याने प्रकाशित केले. त्याची दखल घेत राज्यमंत्री यांच्यासह तालुक्यातील डझनभर नेते व अधिकाऱ्यांनि बुडीत क्षेत्राची पाहणी करून नुकसानग्रस्ताना हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पळसपूर सज्जाचे तलाठी श्री सुगावे यांनि नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान ग्रस्त क्षेत्राचे पंचनामे केले. परंतु तलाठी महाशयांनी आर्थिक देवाण -घेवाण करत मर्जीतील शेतकऱ्यांची नावे पंचनाम्यात समाविष्ठ करून, प्रत्यक्षात नुकसान झालेल्या पळसपूर नदीकाठावरील खर्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे.
पूरग्रस्त नुकसानीच्या पंचनाम्यात खुद्द मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांनी पाहणी केलेल्या जमीन क्षेत्राचाच यामध्ये समावेश केला नाही. या क्षेत्रातील शेतकरी विठ्ठल गायकवाड यांच्यासह अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. यास कारणीभूत असलेल्या लालखोर तलाठी श्री सुगावे यांनी केलेल्या सर्व्हेच्या कामाची चौकशी करून शेतकर्यांना वंचित ठेवल्याप्रकरणी निलंबित करावे अशी मागणी केली. याची दाखल घेत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या आदेशाने हिमायतनगरचे तालुका दंडाधिकारी यांनी मंडळ अधिकारी श्री सय्यद यांना जा.क्रं.२०१४/अतिवृष्टी/ सीआर, दि.३१ जानेवारी २०१४ ला संबंधित शेतकर्यांना वंचित ठेवणाऱ्या तलाठ्याच्या कामाची चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करावा अश्या सूचना दिल्या होत्या. परंतु सदर मंडळ अधिकार्यांनी अद्याप पर्यंत नदीकाठावर जावून कोणतीही चौकशी केली नाही, उलट शेतकर्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या सुगावे नामक तलाठ्यास अभय देवून चौकशी गुलदस्त्यात ठेवली असा आरोप नुकसानीच्या मदतीपासून वंचित शेतकर्यांनी केला आहे.
याबाबत तहसीलदार अरुण जरद यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, मी मंडळ अधिकार्यांना चौकशीचे आदेश दिले, परंतु अद्याप याच्या चौकशीचा अहवाल माझ्याकडे आला नाही असे ते म्हणाले.