नूतन इमारतीचे काम अर्धवट...निजामकालीन जीर्ण इमारतीत पोलिसांचा जीव धोक्यात..!
हिमायतनगर(अनिल मादसवार)जीर्ण झालेल्या इमारतीच्या धोक्यापासून पोलिसांना सुरक्षा मिळावी म्हणून नूतन इमातीचे काम सुरु केले. दोन वर्षापासून सुरु केलेले काम अर्धवट असून, संत गतीने केले जात आहे. परिणामी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पोलिसांना जीवघेण्या इमारतीत कर्तव्य बजवावे लागत आहे. इमारत बांधकामाबाबत होत असलेला गुत्तेदारचा नाकर्तेपणा पोलिसांच्या जीवावर बेतल्यावरच काम पूर्ण होणार काय..? असा संतप्त सवाल कर्मचारी विचारीत आहेत.
सदरक्षणाय...खलनिग्रणाय ... या ब्रीद वाक्याला धरून ४६ ग्रामपंचायतीच्या जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी पार पडत मागील ८७ वर्षापूर्वीच्या जीर्ण होऊ लागलेल्या निजामकालीन इमारतीत येथील पोलिस ठाण्याचा कारभार चालविला जात आहे. मागील काही वर्षापूर्वीच सदर इमारत जीर्ण झाली असून, अनेक ठिकाणी भिंतीला भेगा पडलेल्या आहेत. पावसाळ्यात तर इमारतीच्या छतावरून पाणी टपकत असून, इमारतीच्या भिंतीवर चक्क झाडे उगवल्याचे चित्र प्रत्यक्ष दर्शी दिसून येत आहे. तसेच येथील अधिकारी कर्मचारी व आरोपींना शौच्चालय व पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हि बाब लक्षात घेऊन तत्कालीन पोलिस अधिकार्यांनी हिमायतनगर(वाढोणा) येथील पोलिस स्थानकाच्या नूतन इमारतीसाठी ५८ लक्ष रुपयाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करून घेतला होता.
मंजूर झालेल्या निधीतून नूतन इमारतीच्या कामाचे एप्रिल २०१२ ला नांदेड जिल्ह्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप बिष्णोई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. तेंव्हा त्यांनी काम पूर्णत्वास नेताना बांधकाम दर्जेदार करून येथील सुंदर वृक्षाना जीवनदान द्या. आणि दिलेल्या वेळेत काम पूर्ण करून वस्तू उभी करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग हदगाव येथील अभियंत्याच्या देखरेखी खाली या इमारतीचे काम केले जात असून, आज घडीला यास २८ महिन्याचा कालावधी लोटला तरी बिल्डींगचे काम अर्धवट अवस्थेत आहे. एवढेच नव्हे तर गुत्तेदाराने यात निकुष्ठ्पणा आणल्यामुळे कि काय..? सदर वास्तूच्या भिंतीला तडे जात असून, सदरचे काम हे अंदाजपत्रकाला बगल देऊन केल्याचा आरोप स्थानकातील पोलिस कर्मचार्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना केला आहे. या कामातील दरवाज्याच्या चौकटी सुद्धा सिमेंटच्या बसविल्याचे दिसत असल्यामुळे उपलब्ध ५८ लाखाच्या निधीची पुरती वाट लागल्याचे चित्र यावरून दिसून येत आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन कामाचा दर्जा राखून तातडीने काम पूर्ण करण्यावर भर द्यावा अशी मागणी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावनार्यानी केली आहे.