नांदेड(प्रतिनिधी)निवृत्तीच् या आठ महिने अगोदर लाच प्रकरणी आज एका तहसिलदारासह तीन लोकांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने उमरीत जेरबंद केले.
नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे आलेल्या एका तक्रारीनुसार एका शेतकऱ्याने आपली शेत जमीन विकली.खरेदी करणारा ती जमीन सातबारावर फेरफार करून घेण्यास इच्छूक होता.पण दरम्यान विक्रेत्याच्या पत्नी व मुलांनी तहसिलदार उमरी यांच्याकडे अर्ज दिला की आमच्या संमतीशिवाय ही जमीन विक्री झाली आहे.ती फेरफार करू नये.याप्रकरणाची सुनावणी आणि निकाल 27 मे 2014 रोजी होणार होता.बदललेल्या घडामोडीमध्ये जमीन विक्रेता त्याची पत्नी आणि मुले या सर्वांनी आपली विकलेली जमीन हा चुकीचा निर्णय आहे म्हणून न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी 27 मे 2014 रोजी उमरीचे तहसिलदार उदयकुमार पांडूरंग शहाणे यांनी तो निकाल देवू नये अशी विनंती करण्यात आली.सध्या दिवाणी न्यायालयाला सुट्टया असल्या कारणाने 15 जून नंतर तारीख मिळावी अशी जमीन विक्रेत्याची अपेक्षा होती.म्हणून तशी तोंडी विनंती तहसिलदाराना करण्यात आली.त्यावर तहसिलदारांनी फुकटात तारीख मिळते का?असा मुद्दा मांडला.तेव्हा गरज असणाऱ्या जमीन विक्रेत्याकडे सात हजार रूपयाची लाचेची मागणी करण्यात आली.जेणेकरून तहसिल कार्यालयातील या प्रकरणातील निकाल पुढे ढकलण्यात यावा.
7 हजाराच्या मागणीनंतर तडजोड करून 5 हजार रूपये तारीख वाढवून देण्याचे ठरले.पण तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिंबंध विभागाकडे तक्रार केली.त्यानुसार आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचला.उमरीचे तहसिलदार उदयकुमार पांडूरंग शहाणे वय 57 यांनी उमरी तहसिलऐवजी आपले कार्यालय घरातच थाटले होते.त्यानुसार घरा जवळ सापळा रचला गेला आणि तक्रारदाराने 5 हजार रूपये शहाणे यांना देवू केले तेव्हा शहाणेने ते पैसे लिपीक शंकर गणेश मुंडलीक वय 38 यांच्याकडे देण्यास सांगितले.शंकर मुंडलिकने ते पैसे तहसिलदाराचा खाजगी सेवक दिलीप किशन येरेवाड यांच्याकडे देण्यास सांगितले.तेवढ्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा गुप्त इशारा झाला होता आणि पोलिसांनी तेथे धाड टाकली.तेव्हा ते पैसे दिलीप येरेवाडच्या खिशात मिळाले.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उपअधीक्षक एम.जी.पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आता तहसिलदार शहाणे,लिपीक मुंडलिक व खाजगी सेवक येरेवाड या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द लाचलुचपत प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.हा सापळा पोलिस अधीक्षक व्ही.एन.देशमुख यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक एम.जी.पठाण,पोलिस निरीक्षक गणपत राहिरे,पोलिस कर्मचारी अशोक देशमुख,मोहम्मद उर्फ बाबू पठाण,व्यंकट शिंदे,विठ्ठल खोमणे,सतिश गुरूतवार,मारोती केसगीर,चंद्रकांत कदम यांनी यशस्वी केला.सन 2014 मध्ये आजपर्यंत लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पकडण्याचा हा 19 वा यशस्वी सापळा आहे.