पवना तांड्यात सापडलेल्या सोन्याच्या चर्चेवर पोलिसांचे मौन...
हिमायतनगर(अनिल मादसवार)बारशी दिनी सापडलेल्या सोन्याच्या विटीमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीच्या तपासणीसाठी आलेल्या एका भोंदू महाराजांच्या वक्तव्यावरून हि बाब उजेडात आली होती. त्यात हिस्सा मिळत नसल्याने एका नातेवाईकाने पोलिस स्थानकात तक्रार दिली. राजकीय दबावाखाली आलेल्या पोलिसांनी कोणतीही कार्यवाही न करता अद्याप मौन बाळगल्याने सोने सापडल्याची चर्चा तालुकाभर होताना दिसत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी तथा डोंगराळ भागात येणाऱ्या पवना तांडा परिसरातील शेत शिवारात गुढी पाडव्याच्या दुसर्या दिवशी आलेल्या बारशी दिनी एक पती - पत्नी दाम्पत्य शेताकडे जात होते. शेतातील जमिनीत पाऊल ठेवताच जमिनीच्या काही अंतरावर चकाकणारे वस्तू दिसून आली. त्या वस्तूकडे दुरून पहिले असता डोळ्यांना अंधारी येत होती. हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी दोघे दाम्पत्य तिकडे गेले. पाहताच डोळ्यावर विश्वास बसणार नाही असे दृश्य दिसून आले, त्या ठिकाणी जमिनीवर सोन्याची वीट असल्याची खात्री पटली शेत जमिनीची माती बाजूला सरकविताच त्या ठिकाणी चक्क चार सोन्याच्या विटा आढळून आल्या. त्या घेऊन दोघे दाम्पत्य घरी परतले कोणासही न सांगता सदर विटी सुरक्षित स्थळी ठेवल्या. परंतु त्या दिवशीपासून सदर महिलेचे पतीराज आजारी पडले. आजार कश्यामुळे जडला हे लक्षात येत नसल्याने गावातीलच एका पाणी देणाऱ्या भोन्दुला घरी बोलावण्यात आले, आजाराचे कारण कळत नसल्याने त्यांनी सत्य बाब दाम्पत्याकडून बोलून घेतली. त्यावेळी हा प्रकार उजेडात आला असून, एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला.. असे कळताच सोने पचविण्यासाठी विदर्भातील एकाला पाचारण करण्यात आले होते. त्याच वेळी सदर भोंदू बाबाने हा प्रकार ज्यांना विटी सापडल्या त्याच्या सक्खा भावाला सांगितल्याने त्यानेही आपल्याला यात हिस्सा मिळावा अशी मागणी केली. मात्र यात वाटा देण्यास नकार दिल्यामुळे दोघात चांगलेच भांडण होऊन हाणामारी झाली. त्यामुळे दोघांनीही एकमेकांविरुद्ध पोलिस स्थानकात अर्ज दाखल केले. मात्र यात लिहिलेले भांडणाचे मूळ कारण बाजूला ठेऊन पोलिस स्थानकात केवळ भांडण झाल्याबद्दल एन.सी.दाखल करण्यात येउन प्रकरण राजकीय दबावातून रफा - दफा करण्याचा प्रकार सुरु केल्याची चर्चा आहे.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांच्याशी विचारणा केली असता सोने सापडल्याची बातमी मी सुद्धा ऐकली परंतु अशी अधिकृत तक्रार आमच्याकडे आली नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंध तालुकाभर सोन्याच्या चर्चेला उधान आले असताना पोलिसांनी कश्यामुळे डोळ्यावर हाथ ठेवले आहेत, हे अजून कळलेले नाही.
सदरील घटनेच्या चौकशीसाठी एक पोलिस जमादार घटनास्थळी जाऊन शहानिशा केली असल्याचे वृत्त हाती आले असून, पोलिस सूत्रांकडून मात्र संबंधित घटनेची ठोस माहिती दिली जात नसल्याने संशयाचा भोवरा पोलिसांच्या कार्यक्षमते विषयी अधिक गतीने फिरत आहे. सोने सापडल्याच्या घटनेची अधिकुत नोंद झाली नसून , पैसारात मात्र सोने सापडल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.