मुलीची साक्ष महत्वपूर्ण

विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी नवऱ्याला 5 वर्ष सक्तमजुरी
स्वत:च्या मुलीची साक्ष महत्वपूर्ण ठरली

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)लग्नानंतर 3 अपत्य असणाऱ्या विवाहितेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी तिच्या नवऱ्यास येथील तिसरे जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर यांनी 5 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रूपये रोख दंड ठोठावला आहे.

दि.14 मार्च 2012 रोजी मध्यरात्री नांदेड-लातूर रस्त्यावरील नवीन पुलावरून उडी मारून एका 35 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली.तिचे नाव आशा रोहिदास चित्ते असे होते.ती बळीरामपूर येथील राहणारी होती.15 मार्च 2012 रोजी तिचे वडील सेवानिवृत्त वाहन नागोराव मल्हारी भुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आशाचे लग्न 1995 मध्ये रोहिदाससोबत झाले होते.लग्नानंतर सिमा,आकाश व विकास अशी तीन अपत्ये झाली.नवरा रोहिदास नेहमीच त्रास देत असे.अनेक वेळेस अनेक नातलगांनी समजावून सुद्धा रोहिदासच्या वागण्यात फरक पडत नव्हता.आशा सुद्धा आपला संसार गाढा चालवत असतांना अनेक गोष्टींना दुर्लक्षित करत होती.

दरम्यान रोहिदासने आपली बहीण प्रयागबाई मनोहर गायकवाड यांच्याकडून बांधकामासाठी घेतलेले 13 हजार रूपये आशाच्या वडिलांनी परत करावेत अशी रोहिदासची इच्छा होती.आशाचे वडील नागोराव भुरे यांनी आशाच्या हाताने ते 13 हजार रूपये प्रयागबाईला देण्यास लावले.त्यानंतर एकदा मनोहर गायकवाडने 6 हजार रूपये आशाने प्रयागबाईला दिल्याचे रोहिदासला सांगितले.त्यावरून घरात भांडण सुरू झाले आणि रोहिदास आशाला मारहाण करू लागला.14 मार्च 2012 रोजी पैसे दिल्याबाबत खोटे खरे करण्यासाठी आशा प्रयागबाईच्या घरी गेली पण ती तिला भेटली नाही.ती परत बळीरामपूरकडे येत असतांना तिने या जाचाला कंटाळून नवीन पुलावरून उडी घेवून आत्महत्या केली.

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात याप्रकरणी रोहिदास जळबाजी चित्ते (45),नारायण जळबाजी चित्ते (50) आणि प्रयागबाई मनोहर गायकवाड (60) या तिघांविरूद्ध भादंविच्या कलम 306,34 नुसार गुन्हा दाखल झाला आणि पोलिस उपनिरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी तिघांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.न्यायालयात या प्रकरणी 6 साक्षीदार तपासण्यात आले.सर्वात महत्वपूर्ण साक्ष आशा व रोहिदासची मुलगी सिमा हिची ठरली.तिने 14 मार्च 2012 रोजी घडलेला मारहाणीचा प्रकार न्यायालयाच्या समक्ष कथन केला.

उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश यावलकर यांनी या प्रकरणातील आशाचा नवरा रोहिदास चित्ते याला 5 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रूपये रोख दंड ठोठावला आहे.दंडाची 5 हजार रूपये रक्कम भरली तर मयत आशाचे वडील नागोराव भुरे यांना देण्यात यावी असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ऍड.डी.जी.शिंदे यांनी मांडली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी